मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच महावितरणने दिले ट्रान्सफॉर्म ….!

 

जळगाव जा.:- महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे जळालेले ट्रान्सफॉर्म तात्काळ २ दिवसांमध्ये दुरुस्ती करून द्या ही मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील व वडशिंगी,पाटण,तरोडा या गावातील शेतकऱ्यांनी केली होती.

त्याचे कारण असे की यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा,गहू,कांदा व इतर काही पिकाची लागवड चालू केलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बोर,वीर आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायला चालू केलेले होते.

परंतु अचानकपणे तरोडा शिवारातील डीपी व पाटण शिवारातील (बेंद्रे) डीपी ही पंधरा दिवसाच्या अगोदर जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी द्यायची अडचन निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले पिके सुकू लागले होते.

महावितरण कडे जळालेल्या डीपीची तक्रार करून व बिलाचे पैसे भरून सुद्धा पंधरा दिवसांपासून अधिकारी केवळ आणि केवळ वेळ मारुण द्यायचे.

तरोडा येथील शेतकरी व वडशिंगी येथील शेतकऱ्यांनी अक्षय पाटील यांना सांगितले असता आज दिनांक २ डिसेंबरला महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या वतीने ट्रान्सफॉर्म तात्काळ मिळावे याकरता मुक्काम आंदोलन ठेवले होते.

शेतकऱ्यांनी मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच दोन्ही गावातील शेतकऱ्यांना तात्काळ ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून दिले.

Leave a Comment