जळगाव जा. :- यावर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचा पेरा बऱ्यापैकी केला होता. परंतु आताचे खाजगी बाजारपेठेतील हरभऱ्याचे बाजार भाव ४३००/४५०० पर्यंतचे आहेत. नाफेडच्या बाजारभावात व खाजगी बाजार भावात ८००/१००० रुपयाचा फरक असल्यामुळे हा भाव परवडणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी अंदाजे (६०००) शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदी केलेल्या आहेत.
त्यामध्ये जे नाफेड खरेदी केंद्र चालू आहे त्या खरेदी केंद्रावर दररोज ५५० क्विंटलचे टार्गेट आहे. त्यामुळे ही खरेदी अतिशय थंड गतीने चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त तालुक्यातील १ हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाल्याचे दिसून येते.
उर्वरित बाकी शेतकऱ्यांनी हरभरा कधी विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्याचे दिसून येते त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण तयार झालेले आहे.
एवढ्या थंड गतीने हरभरा खरेदी चालू राहिल्यास शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे नोंदणी केलेल्या उर्वरित हजारो शेतकऱ्यांच्या मालाचा विचार करुन तालुक्यामध्ये नवीन हरभरा खरेदी केंद्र चालू करून प्रत्येक खरेदी केंद्राचे खरेदीचे टार्गेट वाढवावे.
कारण काही दिवसांमध्येच शेतकऱ्याच्या पेरणीला सुरुवात होणार आहे.
तरी शासनाने पर्यायी व्यवस्था करून द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता येईल. कारण प्रश्न हा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे.
ही मागणी घेऊन आज उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद येथे युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी लावून धरली.
यावेळी तुकाराम गटमने, रामभाऊ रोटे, अश्पाक देशमुख, अजय गिरी, गौतम तायडे, स्वप्निल बोरसे, महादेव गटमने, अविनाश पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते